Description
स्वामी विवेकानंद म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचे गतिमय रूप. श्रीरामकृष्ण हे बिंब तर स्वामीजी त्यांचे प्रतिबिंब होत. स्वामीजींच्या चरित्राचे अनुशीलन करताना ही महत्त्वाची गोष्टही डोळ्यांआड होता कामा नये. एरवी स्वामीजींचे जीवन-रहस्य नीट आकळणे असंभव. श्रीरामकृष्णदेवांची अपूर्व आध्यात्मिकताच स्वामी विवेकानंदांच्या रूपाने कार्यकरी होऊन जगताला आणि भारताला नव-संजीवन देऊन शांतीचा मार्ग दाखवून गेली आहे. आजकाल एक रव उठताना ऐकू येतो की, भारत जगाचा पथप्रदर्शक बनणार आहे, जगताला द्यावयाचे भारतापाशी काहीतरी आहे, इत्यादी. भारत काय राजनैतिक, अर्थनैतिक वा तत्सम दान देऊन जगताचा मार्गदर्शक होणार आहे? विवेकानंदांनी स्वत:च म्हटले आहे — या वेळी केंद्र भारत. भारत जगाला दाखरिणार आहे तो अध्यात्म-पथ होय, भारत जगताला देणार आहे ते आत्म-विद्येचे पसायदान होय. भारत याच कार्यास्तव विधि-नियुक्त झालेला आहे. स्वामीजींचे चरित्र वाचून झाल्यावर वाचकाला हा प्रश्न समाधानकारकरीत्या सुटल्यासारखे खचित वाटेल. आणि त्या दृष्टीने स्वामीजींच्या चरित्राच्या अध्ययनाचे अपार महत्त्व आहे. तद्वतच, विशेषत: स्वाधीनता-लाभानंतर सांप्रत ‘भारतीय जीवन मूल्ये’ ‘भारतीय संस्कृति’ वगैरे विषयीही सर्वसाधारण जनतेत जागृती, आरड नि जिज्ञासा दृग्गोचर होत आहे. स्वामीजींच्या चरित्राचे अनुशीलन केल्यानंतर वाचकांना या बाबतीत विशेष लाभेल यात संशय नाही. रवींद्रनाथांनी म्हटलेच आहे की, तुम्हाला भारत कळून घ्यावयाचा असेल तर विवेकानंदांकडे वळा.
Contributors : Sri Satyendranath Majumdar, Swami Shivatattwananda